Saturday 23 June 2018

पाऊस - एक कविता


पाऊस...

हल्ली थोडा उशिरा येणारा,
पण धरतीवर इमानाने बरसणारा...
स्वतः रंगहीन पण निसर्गावर 
मुक्तहस्ताने उधळण करणारा...
कधी गडगडाट कधी संततधार, तरी निष्पाप, 
आपलीच शक्ती न ओळखणारा...
दगड, बोटी, पिशव्या, घाण 
भेद न करता सगळ्यांना पोटात घेणारा...
धावणाऱ्या जगाची तारांबळ उडवून, 
त्यांना सक्तीची उसंत घ्यायला लावणारा...
कित्येकांच्या प्रेमाचा अंकुर फुलवून,
त्यांच्या एकांताचा साक्षीदार राहणारा...
शेतकऱ्याचा "बळी" नाही तर 
त्याला "राजा" बनवण्यासाठी धडपडणारा...

पाऊस...
जुन मध्ये सुरु होऊन सप्टेंबर मध्ये जाणारा, 
मनाच्या कोपऱ्यात आठवणीचा ओलावा ठेवणारा...


Friday 1 June 2018

दाग अच्छे हैं..

४ दिवसा पूर्वीची गोष्ट. खास मे महिन्यातल्या आणलेल्या आंब्याचा रस खाताना एक थेंब माझ्या पांढऱ्या टी-शर्ट पडला आणि अगदी पिक्चर मध्ये दाखवतात तसं मन भूतकाळात गेलं. लहानपणी असंच मे महिन्यात घातल्या जाणाऱ्या पांढऱ्या सदऱ्यावर आंब्याचे डाग पडायचे. पण ते पडल्याशिवाय आंबा खाल्ला असं वाटायचंच नाही.

खरंच, शाळेत असताना कित्ती खास असायचा हा मे महिना आणि मे महिन्याची सुट्टी! सुट्टी खरं तर वार्षिक परीक्षा संपल्यावरच चालू व्हायची, फक्त मध्ये निकाल नावाचा एक सोपस्कार पार पाडावा लागायचा, पण त्याचं कधी टेन्शन आल्याचं आठवत नाही(अपवाद १० वी).   एक बरं, की त्या काळी उन्हाळी शिबिरांचं फॅड नव्हतं, म्हणजे असायची पण कधी घालायचं"च", असा ट्रेंड नव्हता. त्यामुळे आम्ही सुट्टीचा मनमुराद आनंद घेऊ शकलो.

आमचं सुट्टीचं टाइम टेबल एकदम मस्त असायचं - सकाळी ७वाजता(हो, हल्लीच्या मुलांसारखं १०-११ वाजेपर्यंत झोपणं आम्हाला कधी जमलंच नाही) उठायचं, आणि दात घासून चहा पिऊन झाला की खाली खेळायला जायचं -बॅटमिंटन, नेट ची कधी गरज नाही वाटली, दोन काठ्या आणि त्यावर दोरा बांधला की झालं नेट तयार! हे नऊ वाजेपर्यंत. मग घरी येऊन अंघोळ वगैरे करून परत १० वाजता खाली, तेव्हा क्रिकेट खेळायचं. खेळताना तहान लागली की पेप्सी कोला प्यायचो, पाण्याचा किंवा दुधाचा -२ प्रकार होते.  दुधाचा पिस्त्याचा पेप्सी कोला तर मस्तच लागायचा. १२वाजता जास्तच ऊन झालं की घरी जेवायला यायचं, मग गच्चीत पत्ते किंवा भेंड्या. संध्याकाळी ४ वाजता चहा झाला की परत ५ ला खाली ते ७.३० पर्यंत. आम्ही सोसायटी मध्ये मुलं पण खूप होतो त्यामुळे सगळ्यांचा कार्यक्रम असाच असायचा. संध्याकाळच्या खेळात व्हरायटी असायची-  क्रिकेट, सोनसाखळी, किंग किंग, गोट्या, डबा ऐस पैस, कबड्डी, खो खो, फुटबॉल, खपची, स्टॅच्यु, लपाछपी, डोंगराला आग लागली, कांदे फोडी....ऐकले पण नसतील ना हे खेळ,  पण आम्ही खेळलोय. मोबाईल नसल्यामुळे आम्हाला, सगळ्यांनी  एकत्र येऊन खेळायची चांगली सवय होती. आता  मुलं जेव्हा डोकं खाली घालून मोबाइल मध्ये गेम खेळताना दिसतात(कँडी क्रश,अँग्री बर्ड...), खूप अँग्री वाटतं आणि मोबाइल क्रश करावासा वाटतो. 

मोबाईल नसला तरी टीव्ही होता. पण तेव्हा आम्ही आहारी जाऊ एवढे कार्यक्रम नसायचे. सुट्टीत खास मेट्रो चॅनेल वर "फन टाइम" नावाचा दुपारी १२ ते १ मुलांचा कार्यक्रम असायचा, तो मात्र आम्ही आवर्जून बघायचो. त्यात कार्टून, पंचतंत्र वाल्या गोष्टी, असं बरंच काही असायचं.  जेव्हा विसिआर आले, तेव्हा पिक्चर बघायला लागलो व्हिडीओ कॅसेट आणून. मग क्वचित भाड्याने ६ / १२ तासासाठी प्लेअर आणायचा आणि लागोपाठ २ / ४(!)  चित्रपट बघायचे, आणि फक्त घरचेच नाही, तर शेजार पाजार चे सगळे मिळून!  स्वप्नवत च वाटतं  आता सगळं. 

टीव्ही वरून आठवलं, काही दिवसांपूर्वी जाहिरात पाहिली - "खाली डोकं वर पाय" नावाच्या लहान मुलांच्या पुस्तकाची. आत्ताच्या काळाच्या दृष्टीने चांगला प्रयत्न आहे. आमच्या काळी आम्ही चंपक, ठकठक, चांदोबा किंवा कॉमिक बुक्स(मला फँटम आवडायचं) विकत घेऊन वाचायचो, त्यांची कधी जाहिरात व्हायची नाही, पण प्रसिद्ध असायची ही पुस्तक.

आमच्यातले काही सुट्टी निमित्त गावाला जायचे. आमचं गाव नसल्यामुळे मला मात्र त्यांचा खूप हेवा वाटायचा. पण नातेवाईक मात्र होते, काका-मामा-आत्या-मावशा यांच्या कडे ३ ते ४ दिवस राहायला जाणं हे ठरलेलं असायचं. किंवा आमच्याकडे कुणी यायचं. आता एक दिवस जरी कुणी राहायला आलं तरी रुटीन बिघडतं म्हणे.

छोटे छोटे आनंद होते - सकाळी फुलं वेचणे, दुपारी गच्चीत वाळवायला टाकणे, आईला रसना सरबत करायला मदत करणे, भाड्याने सायकल चालवणे, एक ना धड....कित्ती "युनिक" अनुभव होते सगळे या खास दिवसांचे.

आणि अशी मनसोक्त सुट्टी एन्जॉय करून आल्यानंतर शाळा चालू झाली की ही सगळी धम्माल वर्गमित्रांना सांगायची. मुख्य म्हणजे सुट्टीत खास ऐकून, लक्षात ठेवून दिलेले जोक्स. ते पुढे पंधरा दिवस संपेपर्यंत सांगायचे.

हे असं सगळं आठवलं त्या एका डागाने.  मग त्याला वाईट कसा म्हणू? आमच्या  पिढीचं हे नशीब की आम्ही हे सगळं अनुभवू शकलो. याच सगळ्यामुळे तर आम्ही घडलो! पण काळ आता बराच बदललाय, त्याचं तरी काय चूक. कधी कधी वाटतं, आपलीच पिढी चुकतेय की काय की आपण जे अनुभवलं त्याची गम्मत आपण पुढच्या पिढीला देऊ शकत नाही आहोत?  आजची मुलं त्यांच्या मोठेपणी त्यांचं बालपण चांगलं होतं अशी आठवण काढतील का? का  खरंच,  गेले ते दिन गेले?

मन बावरे

तुम्ही "ती सध्या काय करते" हा चित्रपट पाहिला आहे का हो? असेलच आणि आवडला पण असेल. पण तुम्हाला माहिती की अशाच विषयावरचा "96...